अनाथ भावंडांना मिळाला ११४ चौ. फुटांचा शासकीय पट्टा!

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शासनाच्या विविध योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, अपंग, अनाथ आणि निर्वासितांसाठी राबवल्या जात असल्या तरी खरे लाभार्थी मात्र या योजनांपासून कोसो दूर असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार सेलू तालुक्यातील आमगाव मदनी ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे.

म्हसळा येथील अनुज शर्मा (वय १८) आणि महिमा शर्मा (वय १६) या दोन अनाथ भावंडांना शासनाने ११४ चौ. फुटांचा शासकीय पट्टा दिला आहे. दहा वर्षांपूर्वी वडिलांचे आणि सात वर्षांपूर्वी मातोश्रीचे निधन झाल्याने ही दोन्ही मुले पूर्णपणे अनाथ झाली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत सेवा पंधरवड्या दरम्यान गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या सहीनिशी हा पट्टा देण्यात आला आहे. मात्र, ११४ चौ. फूट जागेत ही अनाथ भावंडे निवारा बांधणार को संडास-बाथरूम? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय घरकुल योजनेअंतर्गत किमान २७१ चौ. फूट जागेची आवश्यकता असते, त्यात दोन खोल्या व संडास-बाथरूम बांधकामाचा समावेश असतो. त्यामुळे शासनाचा हा निर्णय अनाथांवरील क्रूर थट्टा असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने फक्त औपचारिकता पूर्ण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात असून, या अनाथ भावंडांना सन्माननीय निवारा मिळावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *