राज्यपाल महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग यांना निवेदन
वर्धा : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षा करिता विविध विषय दिले आहेत पण नागपूर, अमरावती, गडचिरोली ई विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा हा विषय गेल्या १०-१२ वर्षांपासून एम. ए करिता शिकविल्या जातो. या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना व संशोधकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शैक्षणिक पातळीवर सखोल चिंतन होण्यास चालना मिळावी, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही तत्वांचा प्रसार अधिक गतीने व्हावा आणि विद्यापीठांमध्ये या विषयाच्या अध्यापनासाठी पात्र मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत ( सेट ) डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा हा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा अशी विनंती मा कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या मार्फत मा. राज्यपाल तथा कुलपति महाराष्ट्र राज्य, मा. अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा प्राधिकरण यांना गुरुवार दि २५ जून २०२६ रोजी पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व मानवतावादी विचार भारतीय समाजाच्या जडणघडणीत अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळे या विचाराचा, त्यांच्या कार्याचा अधिक व्यापक अभ्यास होण्यासाठी या विषयाचा सेट च्या परीक्षेत समावेश करावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सिनेट सदस्य प्रा डॉ संतोष बनसोड, प्रा डॉ संजय खडसे यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर विभागाचे विद्यार्थी बी. एल. वानखडे, प्रकाश बा. कांबळे, डॉ रवींद्र खंडारे, अनिल वानखडे, गौतम खंडारे, पांडुरंग भगेवार, वर्षा लोणारे, सुषमा पाटील, हेमंत थोरात, पद्माकर मांडवधरे, नितीन भगत, प्रफुल कडू, संजय ओरके, कोहिनूर काळे, सुबोध काळे इ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.