पुलगाव नपचे काम कौतुकास्पद – जिल्हाधिकारी
वर्धा (जिमाका) : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेचे काम राज्यात सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगरपरिषदेने नगरपरिषद क्षेत्रातील घरगणनेचे काम आज दिनांक ३१ मे रोजी शंभर टक्के पूर्ण केले. केवळ १५ दिवसात घरगणनेचे काम पूर्ण करणारी पुलगाव राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.
जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या नेतृत्वात व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रभारी अधिकारी विजयकुमार लालूराम आश्रमा यांनी मागील तीन महिन्यापासून जनगणनेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यामध्ये शहराचे विभाजन करून ब्लॉक पँ तयार करणे, आवश्यक असलेले मनुष्यबळ निवडणे, त्यांना प्रशिक्षण देणे, जनगणनाबाबत जनजागृती करणे, वरिष्ठ कार्यालयासोबत वेळोवेळी संपर्क साधून समस्यांचे निराकरण करणे, असे विविध प्रकारचे नियोजन व तयारी करण्यात आली होती.
पुलगाव नगरपरिषदेने घरगणनेचे काम अतिशय उत्तमपणे पूर्ण केले आहे. अगदी कमी कालावधीत १५ दिवस अगोदरच घरगणणा पूर्ण केली. जिल्ह्यातील इतर नगरपरिषद तसेच ग्रामीण भागात देखील गणनेचे काम उत्तमपणे सुरू आहे. जनगणनेच्या कामात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने जिल्ह्यात उत्तम काम होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी व्यक्त केला आहे.
पुलगाव शहरातील जनगणनेकरिता शहराचे एकूण ४१ ब्लॉक पँ मध्ये विभाजन करण्यात आले होते. त्याकरिता ४१ प्रगणक व ४ राखीव प्रगणक असे एकूण ४५ प्रगणक तसेच त्यांच्यावर पर्यवेक्षकरिता ८ पर्यवेक्षक व २ मास्टर ट्रेनर असे एकूण ५५ कर्मचारी नेमण्यात आले होते. यादरम्यान शहरातील जवळपास ९ हजार ५०० घरांचा सर्वे पूर्ण करण्यात आला. याकरिता जनगणना विभागाचे मुकेश गोंडाने यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच नगर परिषदेचे चैतन्य कन्नाके, सचिन करवाडे, संचित डाखोरे यांनी सुद्धा सहकार्य केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जनगणनेचे सूक्ष्म नियोजन केल्याने व वेळोवेळी आढावा घेणे व नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याने घरगणनेचे काम नियोजित वेळेच्या १५ दिवस अगोदरच पूर्ण करणे शक्य झाले, असे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी विजयकुमार लालूराम आश्रमा यांनी सांगितले.