पोलिसांना आरोपी का मिळत नाही चर्चेचा विषय
वर्धा : वर्धा जिल्ह्यात डिझेल, पेट्रोल माफियांचा हैदोस चालूच आहे. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यात येत नाही. म्हणून खासदारांना शेतकऱ्यांची बाजू मांडावी लागली. परंतु जिल्ह्यात सेवाग्राम-समुद्रपूर मार्गावर करंजी काजी जवळील ढाब्यावर तर सेलू, केळझर आणि पुलगाव मार्गावर अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचा व्यवसाय जोमात चालू असून या व्यवसायाला अभय कोणाचे या चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अवैध व्यवसायात अनेक पांढरपेशे सहभागी असून याची माहिती प्रशासनालाही आहे. परंतु कार्यवाहीच्या वेळी मात्र अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येत असल्याने यातील मुख्य आरोपी कोण, या अवैध व्यवसायात कोण कोण सहभागी याचा उलगडा मात्र होत नाही. मिळालेल्या माहितीनुसार मौजा दहेगाव स्टेशन शिवार काही इसमाची संशयीत रित्या हालचाल सुरू आहे. अशा माहितीवर पोलिस स्टेशन सावंगी येथील पोलिस स्टॉफ तात्काळ घटनास्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सह रवाना झाले असता घटनास्थळावर काळ्या निळ्या रंगाच्या ५४ प्लॅस्टिक कॅन मध्ये अंदाजे १६२० लिटर डिझेल व काळ्या निळ्या रंगाच्या ३७ प्लॅस्टिक कॅन मध्ये अंदाजे १११० लिटर पेट्रोल असे एकुण अंदाजे २७३० लिटर डिझेल, पेट्रोल जु.की. २,८५,७५९ रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे सदरचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन सावंगी येथे गुन्हा नोद करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलिस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक श्री पंकज वाघोडदे सा, ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे व पोलिस स्टाफ पो.उप.नि. सतिष दुधाने, स. फौ. शरद मुन, पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन भगत, संजय पंचभाई, चालक पो.अर्ना. आकाश गोरे, सुमीत राठोड, चालक मपोह अंजली गडेकर यांनी केली आहे.
अवैध डिझेल पेट्रोल तस्करीवर कारवाई करणार कोण?
वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध डिझेल पेट्रोल तस्करीचा व्यवसाय चालू असून याची माहिती प्रशासनाला असतानाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे या व्यवसायाने जिल्ह्यात व्यापक स्वरूप धारण केले आहे. करंजी काजी, सेलू केळझर, पुलगाव रोड, येथे हा व्यवसाय चालू आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.