वर्धा : अजितदादा गेले ही दुःखद बातमी ऐकून शब्द सुचेनासे झाले आहेत. २०१२ साली माझे वडील, स्वर्गीय प्रमोद बाबू शेंडे आजारी असताना अजित दादांनी वर्धा येथे आमच्या घरी येऊन भेट दिली होती. त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, पण पदापेक्षा माणुसकी मोठी मानून त्यांनी आमच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस केली. तो क्षण आजही मनात कोरला गेलेला आहे.
अगदी काही दिवसांपूर्वीच अजित दादा वर्ध्याला आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची आणि माझी भेट झाली, चर्चा झाली. सकाळी आठ वाजताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठक आयोजित केली होती—असा शिस्तप्रिय, कामाला प्राधान्य देणारा उपमुख्यमंत्री मी प्रत्यक्ष पाहिला. आज त्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि मन भरून येतं. असा संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेशी नातं जपणारा नेता आपण गमावला, ही महाराष्ट्रासाठी अपूरणीय हानी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच मनापासून प्रार्थना.