वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवर पूल आहे. पुलगाव – विटाळा पुलाची मागणी वेळोवेळी करण्यात आली. त्याकरिता केंद्र शासनाकडून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
केंद्र सरकारकडून विविध विकासकामांकरिता निधी मंजूर झाला असून त्यामध्ये पुलगाव – विटाळा पुलाच्या कामाचा समावेश आहे. निधी मंजूर झाल्यानंतर खासदार अमर काळे यांच्यातर्फे पुलाच्या निधी मंजुरीकरिता सातत्याने प्रयत्न केल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाणे यांनी, सत्य कधीच लपत नाही. पुलाचे श्रेय जनतेच्या जनआदेशाला, गडकरी यांच्या दिलेल्या शब्दाला आणि आमच्या सातत्य पाठपुराव्याला आहे, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘राजेशाला आमदार करा; हा पूल मी करून देतो’, असे सांगितले होते.
जनतेने राजेश बकाणे यांना निवडून दिले आणि गडकरी यांनी दिलेले शब्द पाळत पूल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. आमदार राजेश बकाणे, आमदार प्रताप अडसड, माजी खासदार रामदास तडस यांनी मंत्रालयात, विभागीय कार्यालये आदी ठिकाणी येथे सतत भेटी देत तांत्रिक फाईल मजबूत केली. अडथळे दूर केले आणि प्रकल्प पुढे नेला,असे सांगण्यात आले.