वर्धा (जिमाका) : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध झाले पाहिजे, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी बार्टी, सारथीच्या धर्तीवर महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या मदतीने आपले चांगले आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
इतर मागास बहुजन कल्याण तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्यावतीने जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच महात्मा फुले यांच्या वाङ्मयाचे पुस्तक संच वितरीत करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते.