सेवा पंधरवाड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा  : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा २०२२ मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवड्याचा समारोप आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुसेळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविण्यात आला.

पहिल्या टप्प्यात पांदन रस्त्यांची मोहिम घेण्यात आली. यामुळे जिल्हाभरातील पांदन रस्ते मोकळे होऊन त्यांना नंबर प्राप्त होणार आहे.

दुसरा टप्पा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पट्टे वाटपाचा होता. अनेक नागरिकांना पंधरवड्यात पट्टे उपलब्ध झाल्याने त्यांना हक्काचे घर उपलब्ध होण्याचा मार्ग निर्माण झाला आहे.

तिसऱ्या टप्प्यात विविध प्रमाणपत्र, दाखले वाटपाची मोहिम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *