अवघ्या दीड वर्षातच झाले भ्रष्टाचाराचे पितळ उघडे(अभय बेदमोहता)
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
सेलू : स्थानिक पातळीवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले सेलुचे सुसज्ज बस स्थानक अल्पावधीतच प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरले आहे. अवघ्या पावणे दोन वर्षांपूर्वी ज्या बस स्थानकाच्या बांधकामामुळे पंचक्रोशीतील नागरिक व प्रवासी सुखावले होते, तेच आज त्याच वास्तूची दैन्यावस्था पाहून त्यांची झोप उडाली आहे. निकृष्ट कामामुळे प्रवाशांना उन्हाळा, पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागला असल्याने व बुधवार चे रात्री निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आलेले छत अचानक भरभरून कोसळल्याने चर्चेला चांगलेच उदान आले आहे. या स्थानकात सुरक्षा व्यवस्था नसल्याने ते मध्यपी आणि समाजकंटकांचा अड्डा बनल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात स्थानकात ही ?प्रवाशांवर छत्री उघडण्याची वेळ आल्याने व बसस्थानकात पाणी झिरपत असल्याने निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.
?कोट्यवधी रुपयांचा निधी पूर्वीच खर्च करून उभारलेल्या या इमारतीचे लोकार्पण झाल्यापासूनच याला ‘नावदशा’ लागल्याचे दिसून आले. उन्हाळ्याच्या दिवसांत आलेल्या वादळी वाऱ्यात पहिले बस स्थानकावर लावण्यात आलेला प्रकाशमय नामफलक उडून गेला आणि स्थानकाची पोलखोल झाली. त्यानंतर पावसाळा सुरू होताच या सुसज्ज इमारतीची छत गळू लागली. बस स्थानकातच प्रवाशांना छत्री उघडून बसण्याची किंवा ओलेचिंब होण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सुरुवातीला समाधान व्यक्त करणारे नागरिक आता संबंधित ठेकेदार, बांधकाम अभियंता आणि कमिशनखोरांना उघड-उघड शिव्याशाप देत आहेत.
?सदर बस स्थानक प्रेमीयुगुलांचे आश्रय स्थळ बनले असून येथे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे बस स्थानक रात्री होताच मध्यपींचा अड्डा बनत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. प्रशासनाचे या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने समाजकंटकांचे चांगलेच फावत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा सरकारी तिजोरीची लूट होणार असून ?सध्या या बस स्थानकाच्या शेडची अनेक ठिकाणी मोडतोड झाली असून, दुरुस्तीच्या नावाखाली या इमारतीचे स्वरूप ‘उजडा चमन’ झाले आहे. यावर झालेला मूळ खर्च तर वाया गेलाच आहे, परंतु आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली होणारा लाखो रुपयांचा खर्च कुणाच्या माथी मारणार ? यासाठी नवीन निविदा काढण्यात आली काय? यासाठी आता अंदाजे खर्च किती होणार व तो कुणाच्या खिशातून होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी कोणी धाडस करून यातील सत्य बाहेर आणणार का, की नेहमीप्रमाणे ‘दोघे भाऊ मिळून खाऊन’ मूग गिळून बसणार? असा सज्जड सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर खडक कारवाई होणार काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बांधकाम करत असताना स्लॅब का टाकण्यात आले नाही व त्याठिकाणी कुणाच्या म्हणण्यानुसार हे पत्रे टाकण्यात आले त्याचे ही नांव नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे.