लोकवाहिनी न्यूज:वर्धा : नीट २०२६ परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना, याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या घोटाळ्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस वर्धा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकार आणि एनटीए विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकार तसेच एनटीए विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘एनटीए रद्द करा’, ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘पेपर लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट युजी २०२६ परीक्षा झाल्यानंतर समोर आलेल्या पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात, मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. एनटीए संस्था तात्काळ रद्द करण्यात यावी, पेपर लीक प्रकरणातील दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष विश्वभूषण पाटील, होमराज रवंदळे, चेतन तमगिरे, गौरव पहाडे, प्रणय राऊत, विश्वजीत मोरे, तन्मय भुरे, अभिषेक सिंग, नितेश नाडेकर, पवन शेळके, ऋतुजा भोयर, दामिनी कुमरे, अशोक चौधरी, प्रज्ञा वैरागडे, अश्विनी सोनकर, नेहाल आलाम, ब्रिजेश सोनकर तसेच नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, डॉ. अभ्युदय मेघे, अर्चना भोमले, अंकुश मुंजेवार, पराग पिंपळे, मोहित सहारे, चेतन कडू, प्रवीण पेठे तसेच आंदोलनात राजकीय नेत्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते.