महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’

भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी

ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी

‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम

वर्धा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने जाहीर झालेल्या भारतीय वन सेवा परीक्षा २०२५ च्या अंतिम निकालात ‘महाज्योती’कडून प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या ८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या निकालासह ‘महाज्योती’ने यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा ‘शंभरी’चा आकडा पार केला असून, प्रशासकीय अधिकारी घडविणारी अग्रगण्य संस्था म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

राज्यातील बहुजन समाजातील, विशेषतः ग्रामीण आणि सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आयएएस आणि आयएफएस सारख्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाज्योती’ केंद्रबिंदू ठरत आहे. वन सेवेच्या अंतिम निवड यादीत मोहिनी अशोक जगताप (४६ रँक), रोहित तुकाराम मालावेकर (६२ रँक), रोहित संजय पवार (६९ रँक), सोहम नामदेव शेंडे (७५ रँक), अक्षय हरिभाऊ पवार (८१ रँक), प्रतीक चंद्रशेखर कुशारे (१०० रँक), दर्शन राजेंद्र सूर्यवंशी (१०२ रँक) आणि अभिषेक योगीराज कट्टे (१०७ रँक) या ८ गुणवंतांनी स्थान मिळवले आहे.

हे सर्व विद्यार्थी आता भारतीय वन सेवेमध्ये (आयएफएस) अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत, अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि संस्थेच्या पारदर्शक प्रशिक्षण प्रणालीला दिले आहे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. याशिवाय अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव मुलाखती आणि अद्ययावत अभ्यास साहित्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. ‘महाज्योती’साठी यूपीएससी निकालात १०० यशस्वी बहुजन विद्यार्थ्यांची कामगिरी ही सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीतील एक मोठी क्रांती असल्याचे मिलिंद नारिंगे यांनी सांगितले आहे.

‘महाज्योती’ आता यशाचा ‘ब्रँड’ : मंत्री अतुल सावे
यूपीएससी वन सेवा परीक्षेत ‘महाज्योती’च्या ८ विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि संस्थेने ओलांडलेला यशाचा ऐतिहासिक ‘शतकीय’ टप्पा, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे. ‘महाज्योती’ आता केवळ एक प्रशिक्षण संस्था उरली नसून, ती ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रशासनात हक्काचे स्थान मिळवून देणारा एक सक्षम ‘ब्रँड’ बनली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *