पगार खात्याच्या विम्याचा मोठा दिलासा: मृतकाच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत

वर्धा (जिमाका) : पुलगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेमार्फत पगार खात्याशी संलग्न असलेल्या अपघात विमा योजनेंतर्गत मृत गजानन साकसावळे यांच्या कुटुंबीयांना तब्बल ५० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे. यामुळे गजानन साकसावळे यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे.

गजानन साकसावळे यांचा १० डिसेंबर २०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बँकेत विमा दावा सादर केला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व तपासणी पूर्ण झाल्यानंतर ४ मे २०२६ रोजी बँक ऑफ इंडिया, पुलगाव शाखेमार्फत ५० लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश वितरित करण्यात आला.

या प्रक्रियेत झोनल मॅनेजर निरमेश जी, मार्केटिंग हेड निलेश वाहने, शाखा व्यवस्थापक स्नेहा सेलोकर तसेच अधिकारी अक्षय ठाकरे, अभिलाष टोपरे, भागवत मुळे, अमोल वैदकर आणि सर्व शाखा कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. बँकेच्या या तत्पर कार्यवाहीमुळे मृताच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

बँक प्रशासनाने ग्राहकांना आवाहन केले आहे की, पगार खात्याशी जोडलेल्या विमा योजनांचा लाभ घ्यावा व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकेल, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी कळविले आहे. ■

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *