वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार दिनांक ८ मे रोजी तहसील कार्यालयाच्यावतीने आर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आर्वी येथे सकाळी १० वाजतापासून सुरु होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा व इतर विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये उपलब्ध होणाऱ्या सेवांमध्ये प्रलंबित फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा आणि आठ-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवांचा समावेश आहे.
आर्वी व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्वी तहसीलदारांनी केले आहे.