वर्धा : नरसापूर येथे चार वर्षीय निरागस मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली घटना अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून महिलांच्या व बालिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
या निषेधार्थ आज दिनांक ६ मे २०२६ रोजी वर्धा येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दुपारी ४ वाजता वर्धा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपला संताप व्यक्त केला.
तसेच राज्यातील महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने कठोर व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निषेध आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.