प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनार येथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यविधीला उपस्थित होते. दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल, खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. चरण ठाकूर,माजी मंत्री रणजित देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्यासह माजी खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दत्ताजी मेघे यांचे काल नागपूर येथे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे दर्शन घेतले होते. आज मुख्यमंत्र्यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवरांनी दत्ताजी मेघे यांच्या पत्नी शालिनीताई दत्ताजी मेघे, पुत्र सागर मेघे व आ. समीर मेघे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
वर्धा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, नागरिक दत्ताजी मेघे यांच्याशी जुळले होते. त्यांनी माझ्यासारखे अनेक आमदार, खासदार घडविले. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांचा अधिक भर होता. प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी हे दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रासह वर्धा जिल्ह्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असे यावेळी शोक संवेदना व्यक्त करताना राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.