वर्धा(जिमाका) : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २ हजार ९४ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मूल्य ६ कोटी १० लक्ष ३० हजार ३७० इतके आहे.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान मिळते, असे विचार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राष्ट्रीय लोकअदालत प्रसंगी व्यक्त केले.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी येथील राष्ट्रीय लोक अदालतीस भेट देऊन विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड उपस्थित होते.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ७ पॅनल तयार करण्यात आले होते. सदर पॅनलवर तडजोड पात्र सर्व फौजदारी अपील व दिवाणी अपील प्रकरणे, तडजोड पात्र सर्व किरकोळ फौजदारी व दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट प्रकरणे, दिवाणी दावे प्रकरणे, भूसंपादन निगडित सर्व प्रकरणे, १३८ एनआय ॲक्टचे प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अंतर्गत प्रकरणे, दरखास्त, विवाह याचिका असे अनेक प्रकरणे ठेवण्यात आली होती.
जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ९०८ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीची रक्कम ५ कोटी ९७ लक्ष २७ हजार ५६६ रुपये इतकी होती. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणांपैकी १८६ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील तडजोडीचे मुल्य १३ लाख २ हजार ८०४ इतके होते.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाददाखल प्रकरणे मिळून एकूण २ हजार ९४ इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ६ कोटी १० लाख ३० हजार ३७० इतके आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव भागवत गावंडे यांनी दिली आहे.