प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : सेलू तालुक्यातील रेहकी येथील शेतकरी रामदास झाडे यांना सीसीआयचे कापूस विक्रीतून आलेले पैसे सेलूच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर १ लाख ८० हजार रुपये होल्ड करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बँक ऑफ इंडियाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याला पैसे न मिळाल्यास बँकेला कुलूप लावण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आहे.
कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असताना आणि नऊ ऑक्टोबर २०२५ चा शासन निर्णय असताना बँकांना शेतकऱ्याला त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अशा निर्णयानुसार एक वर्षापर्यंत कोणत्याही पीक कर्जासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावू नये असा आदेश असल्याचे आंदोलक सांगतात. त्याच गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाच्या स्कॉलरशिपचे आलेले ६० हजार रुपये व १४ हजार रुपये नुकसान भरपाईचे आले ते सुद्धा बँक खात्यावर होल्ड लावून ठेवल्यामुळे बँक मॅनेजर देत नसल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी नापिकीमुळे अडचणीत असताना आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना अधिकारी शेतकऱ्याला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. तेथीलच एका शेतकऱ्याचे विहिरीचे आलेले ४० हजार रुपयांचे अनुदान सुद्धा बँकेने दिले असून होल्ड लावून थांबवून ठेवण्यात आले आहे. शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्याचे कापसाचे आणि अनुदानाचे पैसे शासन निर्णय असतानाही कर्जाचा तगादा लावल्यामुळे थांबून ठेवले असून ते पैसे शेतकऱ्याला न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत बँक ऑफ इंडियाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. बँक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात नितेश कराळे, राजेश झाडे, रामदास झाडे, जीवन लाडे, सचिन झाडे, मंगेश मेहरकुरे, शुभम भिरमगडे, दिनेश झाडे, शुभम भस्मे, आरईफ शेखर, रोशन बांदिले, सुनील गायकवाड, विठ्ठल मंगाम आदींचा सहभाग होता.