वर्धा -५३ वर्षाखालील सर्व वर्ग १ ते ८वीला शिकविणार्या शिक्षकांना सरसकट टीईटी पात्रता परीक्षा बंधनकारक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करून कोणताही शिक्षक सेवेतून मुक्त होण्याची वेळ येणार नाही, य मागणीला घेऊन शिक्षकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविले. हे आंदोलन नागपूर विभाग अध्यक्ष अजय भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

दीड – दोन तासात होणार्या टीईटी पात्रता परीक्षेच्या आधारे शिक्षकांची पात्रता ठरवून गेल्या २०- २५ वर्षापासून प्रामाणिकपणे अध्यापनाच्या केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, या सबबीखाली शिक्षकांना सक्तीने सेवा मुक्त करणे किंवा स्वेच्छा निवृत्ती घेणे ही बाब न्याय संगत नसल्याने शासनाने याप्रकरणी कार्यरत सर्व शिक्षकांना संरक्षण देणेबाबत योग्य ती पावले उचलावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.