आता पुन्हा नवीन पुस्तके खरेदीसाठी पालकांवर दबाव, चौकशी व कारवाईची मागणी
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल, म्हसाळा (जि. वर्धा) येथे विद्यार्थ्यांना एका विशिष्ट पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, ती पुस्तके काही महिन्यांतच निरुपयोगी ठरवून आता पुन्हा नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार सत्र २०२६-२७ सुरू होण्यापूर्वी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना ‘Unique Traders’ या दुकानातून पुस्तके खरेदी करण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यावेळी NCERT पुस्तके उपलब्ध असूनही इतर प्रकाशनांची पुस्तके घेण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी पालकांकडून हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करून घेण्यात आला. यानंतर शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर काही महिन्यांत शाळेने पूर्वी खरेदी केलेली पुस्तके बाजूला ठेवून नवीन पुस्तके वापरण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आधी विकत घेतलेली पुस्तके निरुपयोगी ठरली असून पालकांवर पुन्हा नवीन पुस्तके खरेदी करण्याचा आर्थिक बोजा पडला आहे.