जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

बोर नदीवरील पूरसंरक्षण भिंतीचे भूमिपूजन, सेलू येथे तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम
वर्धा (जिमाका) : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना थेट देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा, तालुका स्तरासोबतच गावस्तरावर जनसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

सेलू तालुका प्रशासन व जलसंपदा विभागाच्यावतीने सेलू येथील शिवमंदिरात जनसंवाद कार्यक्रम तसेच आपत्ती व्यवस्थापन, सौंदर्यीकरण अंतर्गत बोर नदीवरील पाच गावातील संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार रामदास तडस, सेलू नगर पंचायतच्या अध्यक्षा स्नेहलता देवतारे, सेलू तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशोक मुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अशोक कलोडे, ज्योती धोंगडे, दामिनी डेकाटे, तहसीलदार शकुंतला पाराजे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

जनसंवादाच्या माध्यमातून शासन राबवित असलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते. जिल्ह्यात विविध विकास कामे करीत असतांना ग्रामीण भागातील नागरिकांचा थेट संबंध पंचायत समितीशी येतो.

जुन्या मोडकळीस आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीमुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत होता. यासाठी नवीन इमारत बांधण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. तहसील कार्यालय इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, तालुका कृषि कार्यालय इमारत बांधकामास मंजुरी प्राप्त झाली असून लवकरच या इमारतींचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याचे पुढे बोलतांना श्री. भोयर म्हणाले.

रुपये ४५ कोटी खर्च करून तालुका न्यायालय तसेच सेलू येथे नमो उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सोबतच वर्धा येथे नव्याने १०० एकरवर कारागृहाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. वर्धा व सेलू तालुक्याला पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोर व धाम प्रकल्पातील पाण्याचा वापर होत आहे. या प्रकल्पाच्या कॅनल दुरुस्ती, क्षमता वाढ व नूतनीकरणासाठी प्रती प्रकल्प १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. बोर नदीवर ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव व देरडा येथे पूरसंरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याने पावसाळ्यामध्ये पूर परिस्थितीत नदीकाठावरील गावांचे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे डॉ. पंकज भोयर म्हणाले.

जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या व अडचणी दूर होण्यास मदत होऊन प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. हा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विकासाचा रथ असून राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. यामुळे मोठा विकास होत असल्याचे रामदास तडस यावेळी म्हणाले. स्नेहल देवतारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते बोर नदीवर ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव व देरडा येथील वर्धा नदीवर ५ कोटी ७० रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमात सेलू तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी व समस्यांचे निवेदन स्वीकारून तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांच्या हस्ते महसूल, कृषि, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, बाल विकास विभाग, आरोग्य विभागाच्या विविध योजनेच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे विभाग प्रमुख, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *