सोलर पथदिव्यांमुळे ग्रामपंचायतीचा वीज देयकाचा भार कमी होणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : राज्यातील सर्व शासकीय शाळा, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीचे विद्युत देयक शून्यावर आणण्यासाठी प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती सोलरवर कार्यान्वित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजदेयाचा भार कमी होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी म्हणाले.

नालवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने आरती चौक ते नालवाडी मार्गावर 41 लक्ष रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या सोलरवरील पथदिव्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, सुनील गफाट, जयंत कावळे, किरण उरकांदे आदी उपस्थित होते.

पूर्वी दत्तपूर ते आरती चौक हा मुख्य वर्दळीचा रस्ता होता. राज्य शासनाने गेल्या दहा वर्षात जिल्ह्याला अनेक महामार्गांनी जोडून रस्त्याचे जाळे पसरविण्याचे काम केले आहे. सोबतच इतर विकासाच्या कामांना शासन प्राधान्य देत आहे. पुणे, नागपूर यासारख्या शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून पुढील काळात वर्धा पर्यंत मेट्रो सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागाच्या विकासावर शासनाचा भर असून मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या इमारती नव्याने बांधण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत भवन बांधकाम योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या इमारती नव्याने बांधण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी फलकाचे अनावरण व कळ दाबून सोलर पथदिव्यांचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *