आंजी (मोठी) गाव वर्धा तालुक्यातील एक मोठे गाव असून या गावाच्या सभोवताल वर्धा, आर्वी व सेलू तालुक्यातील जवळपास ५० ते ६० गावे जोडली आहे. सदर गावे दुर्गम भागात असल्याने येथील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळताना अनेक अडीअडचणी येत होत्या. सदर भाग ग्रामीण असल्याने शेतात काम करीत असताना सर्पदंश अथवा अन्य घटना किंवा रात्री अपरात्री रुग्णांना उपचारासाठी नेताना अनेक अडचणी येत होत्या. जवळचे रुग्णालय वर्धा होते. वेळेपर्यंत रुग्णांना नेताना अनेकदा त्यांचा वाटेत मृत्यू होत होता. त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी आंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्याची मागणी शासन दरबारी लावली होती.
राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व भाजपाचे आ. राजेश बकाणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे दोघांनी शासन दरबारी हा विषय लावून धरल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी आंजी येथील ग्रामीण रुग्णालयाला मान्यता दिली. आंजी येथे ३० खाटांचे रुग्णालय होणार असून त्यावर अंदाजे २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जागेची पाहणी करून पायाभूत सुविधा, इमारत बांधकाम, सोयी सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. सुनिल गफाट यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच आंजी व परिसरातील गावांना आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.