मुंबई: कृषि विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयोटॉ सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे’ शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प सादरीकरणाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी बैठकीत कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, ऑनलाइन व्ही.सी.दवारे कृषि राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,अपर मुख्य सचिव वित्त विकास चंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषि विभागाचा सचिव परिमल सिंह, नानाजी कृषि संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक मीनल करनवाल, सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अजित जावकर, मायक्रोसॉफ्टच्या सपना मोहरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता व ?ग्रोटेक नाविन्यता केंद्राचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग दाभाडे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हवामान बदल, पाणीटंचाई, जमिनीची घटती सुपीकता, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचा विभागनिहाय पिकवार अभ्यास करावा.पिकांची वाढ, पाण्याची गरज, जमिनीतील ओलावा, हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादन याबाबत विविध स्रोतामधून माहिती संकलित करून एकत्रित सक्षम डिजिटल प्रणाली तयार करावी. मिळणाऱ्या माहितीचे मशीन लर्निंगच्या माध्यमातून विश्लेषण करून शेतकऱ्यांना पीकनिहाय आणि शेतनिहाय सल्ला देण्याची गरज असून जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिके व निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी. ‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर कमी करावा. पिकासाठी या मॉडेलद्वारे पिकाचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मॉडेल विकसित करावे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.